Breaking News

'जन वन विकास' योजनेतून 55 गावांचा होणार सर्वांगीण विकास


समितीच्या पदाधिका-यांना मार्गदर्शन करताना वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर

GADCHIROLI TODAY
गडचिरोली : गडचिरोली वनविभागाअंतर्गत चातगाव परिक्षेत्रात वाघाचा प्रादुर्भाव असल्याने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत 17 तर गडचिरोली वनविभागातील 38 गावे अशा एकूण 55 गावांची निवड करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून या गावांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होणार आहे.
निवड झालेल्या गावांमध्ये चातगाव, सावरगाव, कुरखेडा, पांढरसडा, घोटेविहीर, कटेझरी, मोहडोंगरी, आंबेशिवणी, आंबेटोला, मुरुमबोडी, बोथेडा, मौशीचक, गिलगाव, देऊळगाव, गुजनवाडी, भुरानटोला, मौशीचक आदी गावांचा समावेश आहे. अमिर्झा येथे सर्व समित्यांच्या अध्यक्ष/सचिवांची गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा घेण्यात आली. सभेला चातगाव समितीच्या अध्यक्ष कांता वलके, कटेझरीचे राजेश नैताम, मोहडोंगरीच्या रेखा गुज्जलवार, मौशीचकचे सत्यवान कोहपरे, सावरगावचे गजानन मडावी, घोटविहिरचे रवींद्र पदा उपस्थित होते.
सदर सभेत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत गावकऱ्यांच्या मदतीने ओलिताखालील क्षेत्रफळ वाढविणे, कुकुटपालन, दुग्ध व्यवसाय, कृषी यंत्रे, बदक वाटप, चारा व्यवस्थापन, सौर कुंपण आदी कामे करण्याविषयी चर्चा करण्यात आली. वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी सदर योजनेचा लाभ घेऊन अल्पभूधारक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी तत्वावर पाण्याचे नियोजन केल्यास बोअरवेलद्वारे दुबार पीक घेता येईल. शेतीसोबत जोडधंदा करून उत्पन्न वाढवून गावाचा सर्वांगीण विकास करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चातगाव वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकरी पडवे, तांबे, मोहुर्ले, सिध्दार्थ मेश्राम, संदीप आंबेडारे आदींनी सहकार्य केले.

No comments